धाराशिव (उस्मानाबाद)

विलिनीकरणाचे ठाऊक नाही मात्र, निवडणुकीत मनोमिलनाची पुष्टी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु होती, ती अंतिम टप्प्यात आली होती, असे दावे केले जाऊ लागले आहेत. या दाव्यांतील तथ्ये ती करणाऱ्यांनाच ठाऊक असली तरी, एक मात्र खरे. निवडणुकीपूर्वीच मनोमिलन झाल्याचे लढतींवरून स्पष्ट होत आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी मिळून २८ जागांवर रिंगणात आहेत. यातील एकाही जागेवर ते आमनेसामने नाहीत. यावरून किमान मनोमिलनाला तरी पुष्टी मिळते.

धाराशिव जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना शरद पवारांची राष्ट्रवादी यात सहभागी होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात या चर्चेतून ती बाहेर पडली. उद्धवसेनेने पालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चेत फारसे स्वारस्य दाखवले नाही. जागावाटपावरून बिनसल्याच्या चर्चेला आता कोणताही अर्थ राहिला नाही. एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा व गटांमध्ये होत असलेल्या लढती पाहिल्यास हे पूर्वनियोजित नव्हते, असे म्हणण्यालाही कोणता अर्थ उरत नाही. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेची राळ अजितदादांच्या निधनानंतर या दोन दिवसांत उठली आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन्ही राष्ट्रवादींनी उमेदवारी दाखल करतानाच समन्वय राखला होता की काय, त्यांच्यात पूर्वीच मनोमिलन घडून आले होते की काय, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. ५५ जागांपैकी दोन्ही राष्ट्रवादी २८ जागांवर लढतीत उतरल्या आहेत. यातील एकाही जागेवर ते आमनेसामने नाहीत, हे विशेष. यावरून किमान मनोमिलनाची तरी पुष्टी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *