बोरगाव मंजू (जि. अकोला): राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नवीन बायपास वाय-पॉईंटजवळ धावत्या कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात एक महिला व एक पुरुषाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात खुशरंग भिलुजी मायवाड (वय ५०) व अनिता खुशरंग मायवाड (वय ४८, दोघेही रा. बैतूल, मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये मोनू मुरली हारोळे, शिवा मुरली हारोळे, रोहित खुशरंग मायवाड, बामी मायवाड यांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथून मध्यप्रदेशातील बैतूलकडे परत जात असताना कार क्रमांक एम.पी. ४८ झेड.एच. ४८२२ च्या डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहन पूर्णपणे उलटले. अपघातानंतर परिसरातील शेतात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख, गजानन तिडके, नितीन बोपुलकर व इतर शेतकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी प्रमोद डोईफोडे, किशोर सोळंके, शुभम फलके व ज्ञानेश्वर जामोदे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कारमधून बाहेर काढून अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ व पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे करीत आहेत.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.

