मुंबईत भाजपाचामहापौर बनणे हा मुंबईसाठी, १०६ हुतात्म्यांसाठी आणि मराठी मनासाठी काळा दिवस असेल. मुंबईचे अस्तित्व, मुंबईची अस्मिता संपवण्याची कामगिरी भाजपाने केली आहे. भविष्यात ही मुंबई उद्योगपतींच्या हातात दिली जाईल. भाजपाची भूमिका ही कायम मुंबई स्वतंत्र करावी या विषयाशी संबंधित आहे, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. संजय राऊतांना भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेवर ज्या दिवशी महायुतीचा महापौर बसेल तो दिवस सुवर्ण दिन असणार आहे. २५ वर्ष मुंबईची होणारी लूट थांबवण्याचा, मुंबईला खड्ड्यातून बाहेर काढण्याचा तो सुवर्ण दिन असेल असे भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी म्हटले आहे. अर्थातच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसाठी तो काळा दिवस असणार आहे. जनतेने तुम्हाला मतरूपी काळे फासले त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. आता पुढची पाच वर्ष तुमच्यासाठी रोजच काळा दिवस असेल, अशी खोचक टिप्पणीही बन यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायद्याचे रक्षक
संजय राऊत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही. ११ कोटी जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला सक्षम करण्याचे आणि कायद्याचे राज्य उभारण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी मात्र महाराष्ट्राची लूट केली. संजय राऊत यांच्यासारख्या कायदेविरोधी, भ्रष्ट लोकांना खरी जागा दाखवून देण्याचे काम फडणवीस करत आहेत, असा पलटवार बन यांनी केला.
दरम्यान, अजितदादांच्या निधनानंतर लागलीच दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत राजकारण करत होते. अजितदादांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास होता हे महाराष्ट्राने बघितले आहे. सकाळचा शपथविधी झाला होता, त्यावेळीही अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला होता. त्यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसची साथ सोडून अजितदादा पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या बरोबर त्याच विश्वासापोटी आले होते असे बन म्हणाले.
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने साप्ताहिक तळोदा वेध खबर आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.




