विद्यार्थी कॉर्नर

तरुणांनो, स्वयंरोजगाराकडे वळा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पणजी : ‘देशातील इतर भागांप्रमाणेच गोव्यातही तरुण पांढरपेशा नोकऱ्या शोधतात. परंतु सर्वाना सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यामुळे युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सुमारे ७० हजार सरकारी कर्मचारी गोव्यात आहे. ही संख्या आणखी वाढवता येणार नाही. युवा वर्गाने उद्योजकतेकडे किंवा स्वयंरोजगाराकडे वळावे यासाठी वेगवेगळ्या सवलती आम्ही देत आहोत. उद्योगांशीही हातमिळवणी केली आहे. कौशल्य विकास व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. राज्यात पर्यटन व्यवसाय, शिपबिल्डिंग, मच्छीमारी या क्षेत्रात बराच वाव आहे. देशभरात एकूण जेवढी औषध निर्मिती होते, त्यातील १० टक्के औषधांचे उत्पादन गोव्यात होते. त्यामुळे फार्मास्युटिकल कंपन्यांमध्येही तरुणांना बराच वाव आहे. ईडीसीच्या माध्यमातून स्वयंरोजगारासाठी २ ते ८ टक्के दराने अल्पव्याजी कर्ज दिले जाते.’पुन्हा भाजपचेच सरकार

२०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रश्न केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गेल्या सात वर्षांच्या काळात गोव्यात झालेला विकास सर्वश्रुत आहे. लोकांचा आशीर्वाद माझ्या व भाजपच्या पाठीशी आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचेच सरकार येणार हे निश्चित.’

हॅपिनेस इंडेक्स वाढतोय

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गोमंतकीयांचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढावा यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. ‘इज ऑफ लिव्हिंग’वर भर दिला जात आहे. स्टार्ट अपमध्ये गोवा राज्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्टार्ट अप सुरू करण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जात आहे.’मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्यात शैक्षणिक स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात. मिडल स्कूलपासून महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थ्यांसाठी समुपदेशक नेमले आहेत.’ एका प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित आहे त्यामुळे अधिकाधिक पर्यटकांनी गोव्याला भेट द्यावी, अशी आमची इच्छा आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *